विचारधारा मनसे

राजसाहेब ठाकरे हे तरुण व तडफदार नेतृत्व महराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांसमोर नवा पर्याय म्हणून महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी, बदल घडविण्यासाठी व विचारांचे परिवर्तन करण्यासाठी सज्ज झाले आहे. आजपर्यंत ज्यांना जमले नाही ते या एका तरुणाने आपणांसमोर सिद्ध करून दाखविले आहे. एकाच नेता, एकाच विचार, एकाच मक्ता! आतापर्यंत दहा नेते त्यांचे दहा मेंदू त्यामुळे दहा वेगवेगळे विचार असायचे. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर निर्णयापेक्षा गोंधळाच जास्त; परंतु मनसे हा पक्ष एकाच विचारांवर चालतो. त्यामुळे निर्णय त्वरित! आणि त्या निर्णयांवर अंमलबजावणी सुरु! मग मराठी पाट्यांचा विषय असो, रेल्वे भरतीचा विषय असो, नोकरभरतीचा असो अथवा मराठी अस्मितेचा! ज्या विषयाला हात घातला तो तडीस नेलाच म्हणून समजा. जितके बोलणार- तितकेच करणारा पक्ष! आणि जितके करणार - तितकेच बोलणारा नेता!

आजपर्यंतचा इतिहास साक्षीदार आहे कि ज्यांना एक पक्ष वाढवायला कित्येक वर्ष लागली तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेलीसारखा झटक्यात वाढला. ज्यांना आपल्या पक्षाला राजकीय पक्ष म्हणून दर्जा प्राप्त करायला कित्येक वर्ष लागली तिथे मनसे हा पक्ष कमी कालावधीत मान्यताप्राप्त झाला.

ज्यांना सत्ता मिळवण्यासाठी ४० वर्षे लागली तिथे एकाच फटक्यात १३ आमदार निवडून आणले. जिथे इतर दिग्गज मंडळी तळ ठोकून बसतात तरीही एखादी सीट येऊ शकत नाही तिथे फक्त राज साहेबांच्या एका आवाजाने संपूर्ण नगरपालिका ताब्यात येते.

जनतेचे हित पाहून त्यांचे प्रबोधन करण्यापेक्षा त्याच जनतेचे हाल करून राज्यकर्त्यांनी जो 'उद्योग' चालवला आहे तो आता बंद करणे जिकरीचे होऊन बसले आहे. राज्यकर्ते, नोकरशाही मंडळीनी हातात हात घालून सामान्य जनतेची दिवसाढवळ्या लुटमार चालवली आहे आणि सामान्य माणूस नजरेने षंढासारखा नुसता 'आँ' वासून बघत उभा आहे. एवढ्या मोठ्या राज्यात असे सारे चालायचेच असे म्हणून राज्यकर्ते स्वतःची आत्मवंचना करून घेऊ लागलेत. यामुळे सुशिक्षित व सुसंस्कृत माणसांनी राजकारणात यावे असे म्हणणे म्हणजे विनोदच होऊन बसला. याच भूमिकेला छेद देण्याचे काम उद्याच्या सुजलाम, सुफलाम महाराष्ट्राचे भाग्यविधाते मा. राजसाहेब ठाकरे यांनी केले. आपल्या ज्वाज्वल्य विचारांनी त्यांनी बहुसंख्य तरुणांना एकत्र घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची बांधणी केली व पाहता पाहता यश पादाक्रांत करू लागले हे सर्व पाहता आम्हाला 'मनसे' हाच महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आशेचा खरा किरण असल्याचे दिसत आहे.